पाठ्यपुस्तकातील व रानावनातील निखळ आनंद देणार्या कविता लिहिणारे आमचे कविमिञ सचिन बेंडभर -पाटील यांचा ” येते जगाया उभारी ” हा कवितासंग्रह नुकताच वाचण्यात आला . कवी सचिन बेंडभर यांच्या कवितांचा अवाका खूप मोठा असुन शेतकर्यांच्या वेदना, दु:ख , यातना यावर प्रकाश टाकणारा दस्ताऐवज आहे .
साहित्य विश्वात अनेक मोठ-मोठे साहित्यिक आपणास पहावयास मिळतात. परंतु इतक्या कमी वयात व कमी वेळात विपुल साहित्य संपदा निर्माण करणारा साहित्यिक जगावेगळा .
बालसाहित्यिक असलेल्या बेंडभर यांनी साहित्य क्षेञातील कोणतेच साहित्य सोडले नाही. त्यांची ग्रंथ संपदा वाचुन थक्क व्हायला होतं.
त्यांचे१) आजोबाची शिकवण २)गोप्याची चतुराई ३)गुरुदक्षिणा ४)खरं सोनं ५) धाडसी बंडू ६) वाघाची डरकाळी ७)मायावी तळ्याचे रहस्य ८)बळी तो कानपिळी ९) धाडसी शिवशंकर १०)ज्ञानसागर ११)भानाचं भूत१२) जादूची अंगठी १३)सुर्यनारायणाचे वरदान हे ” बालसाहित्य ” १)हिसका २)नानाची टांग ३)हरवलेली वाट ४)मनकवडी ५)हीच खरी दौलत ६)प्रसिद्ध लेखक ७)हनमाचा हनीमून ८)मुक्काम पोस्ट पैलवानवाडी .हे कथासंग्रह तर १) रानपाखरांची शाळा २) वर्तुळ ३) काॅलेज कट्टा या कादंबर्या प्रसिद्ध आहेत . १) होलाष्टक २)वेदना ३)सप्टेंबरची राञ ४)अंधारात लपलेला चंद्र ५) भीती ही अनुवादीत पुस्तके आहेत . १) मनातल्या कविता २)शिंपल्यातील मोती ही संपादीत पुस्तके आहेत . तसेच १) रानवारा २)गाणं शिवाराचं ३)येते जगाया उभारी हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
असे विपुल साहित्य लेखन करुन त्यांनी वाचकांना साहित्याची अनमोल मेजवानी दिली आहे. त्यांची शालेय पाठ्यपुस्तकात कळो निसर्ग मानवा ही कविता सहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ आहे .एवढे प्रचंड लेखन करुनही त्यांची साहित्य निर्मितीची भूक थांबत नाही. अनेक पुस्तकांवर त्यांची नियमित समिक्षा लेखन चालुच असते . त्यांच्या साहित्य निर्मितीला सलाम.
त्यांच्या गंध मातीचा या कवितेत ते म्हणतात,
धावे मोकाट हा वारा,त्याच्या संगे जलधारा
वीज मध्येच गर्जते,येई अंगावं शहारा
गाय वासरा बोलते वर्षावात भिजायाचं
ओल्या अंगाने गायाचं,वत्सा गाणं शिवाराचं .
पावसाळी दिवसातील ही कविता वाचुन माणसासहीत पशु-पक्षीही पावसाचा आनंद घेऊन गाणं गाऊ लागतात . खरंतर उन्हाळा संपल्यानंतर प्रत्येक सजीव पावसाची आतुरतेने वाट पहात असतो . पावसाच्या आगमनाने सुखावत असतो. त्या आनंदापासुन गायी वासरं कशी दुर राहतील अशी सुंदर चिञण सदर कवितेत कविनं रेखाटलं आहे. अतिशय सुंदर अशी ही कविता संग्रहात भाव खाऊन गेल्याशिवाय रहात नाही.
पुढं खुशाल त्याला हात उगार या कवितेत ते म्हणतात,
हात ओला नाही झाला ,तर सोकावलेला देतो नकार
झटक भीड ,निर्भय बन,लगेच त्याला जाब विचार
व्यवस्थाच नासत चालली,खाली दिसते तेच वर
आधाराला जागाच नाही , कुंपणच इथे खातय घर
या कवितेतील ओळी माणसाला खुप काही शिकवून जातात. हे जग किती स्वार्थी आहे, याचा दाखलाच कविनं वाचकापुढं ठेवला आहे. मिञांनो जो पर्यंत तुमचा फायदा इतरांना होत असतो तो पर्यंत फायदा घेणारा तुमची भरपुर स्तुती करत असतो परंतु तुम्ही हात आखडता घेतला की तुमच्या नावानं शिमगा चालु होतो. म्हणजेच हे जग किती मतलबी आहे याचे ज्वलंत उदाहरण कविनं आपल्या काव्यातं व्यक्त केलं आहे. शेतकर्याचा प्रत्येकजन गैरफायदाच घेत असतो. त्याच्या घामाची,कष्टाची किंमत केली जात नाही. याला इथली व्यवस्था समाज व आपण सर्वच थोड्याफार प्रमाणात जबाबदार आहोत, असे कविला या ठिकानी सुचवायचे आहे.
खंत कवितेतील खंत मनाला चटका लावून जाते.
गेली उडून पाखरे,येता पंखामध्ये बळ
रिते उदास घरटे ,उगी शोधिते आभाळ
पाही उडताना थवा,माझे असेल का त्यात
मनी वेडी आशा त्याच्या,म्हणे येईल परत
खरंच हा निसर्ग नियम आहे की जो पर्यंत आपली मुलं काय किंवा पशु -पक्षांची पिल्लं काय जो पर्यंत त्यांच्या पंखात बळ येत नाही तो पर्यंत आपल्या कुशित विसावतात.परंतु एकदा का त्यांच्या पंखात बळ आले कि भूर्रदिशी उडून जातात. पुन्हा घरट्याकडे लवकर येत नाहीत. काही मुलं विदेशात नोकरीनिमित्त जातात तेंव्हा त्यांचे आई- वडील आपल्या मुलांची वाट पहात आकाशाकडे डोळे लाऊन वाट पहात असतात की कधी माझं लेकरु परत माझ्या घरात येईल. खुप मोठ्या भावनिक अर्थानं ही कविता वाचकाला अंतर्मुख करते.
ते पुढे आपल्या अनाथ डोंगर या कवितेत म्हणतात,
गावाकडचा वत्सल डोंगर
हरवून आपले नीज हिरवेपण
सुरुंगस्फोटा हृदयी झेलीत
सोशी वेदना उदास जीवन
खरंच मिञांनो आत्ता आपले गावचे डोंगर सुद्धा सुरक्षित राहिले नाहीत. प्रगती आधुनिकिकरण यात संपुर्ण निसर्ग नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणारा निसर्गच आता धोक्यात आला आहे. कधी कधी वाटतं या उदात्तीकरणाच्या नादात आपण या भूतलावर असनार्या हजारो -करोडो वर्षापासुन दिमाखानं उभ्या असणार्या टेकड्या खाऊन फस्त करुन टाकु. त्यांच अस्तीत्व हिरावून घेऊ. आज मोठ-मोठे सुरुंग लावून डोंगर ,टेकड्या नष्ट केल्या जात आहेत ही पर्यावणाची कधीच न भरुन येणारी बाब पाहुन कवी हळवा होतो व या पुढे आपण पुढील पिढीसाठी काही ठेवणार आहोत की नाही असा प्रश्न करतो.
या कविता संग्रहात एकुण ८८ कविता असुन सार्याच कविता अतिशय वाचणीय आहेत. पुस्तक प्रकाशक रुपाली अवचरे, निखिल लंभाते यशोदिप पब्लिकेशन्स पुणे यांनी अतिशय रेखाव केले असुन विष्णू थोरे यांनी अतिशय सुंदर व देखणे मुखपृष्ठ केले आहे. काव्यसंग्रहाची छपाई व पाने अतिशय दर्जेदार असुन छपाई सुंदर झाली आहे . त्यामुळे हा काव्यसंग्रह हातात पडताच वाचण्याचा मोह आवरता येत नाही. सर्वच आघाड्यावर अतिशय सुंदर झालेल्या या काव्यसंग्रहास माझ्या खुप खुप शुभेच्छा.
सर्वांनी निश्चित वाचावा व आपल्या संग्रही ठेवावा असा सर्वांग सुंदर काव्यसंग्रह म्हणजे येते जगाया उभारी.
सचिन बेंडभर सरांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा .
