मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
*पराग* या हिंदी बाल मासिकाचे संपादक स्वर्गीय आनंद प्रकाश जैन यांनी एके ठिकाणी म्हटले होते की, *मुलांसाठी लिहिल्या जाणाऱ्या साहित्यात नव्वद टक्के आनंद तत्त्व असले पाहिजे… रचना संरचनेच्या आधारभूत आवश्यकतेला वेगळे ठेऊन उरलेला दहा टक्के भाग त्या बाल साहित्यिकाचा वाटा असतो. ज्याला तो मोठ्या कौशल्याने अप्रत्यक्षरीत्या बाल साहित्याच्या मूळ वस्तू आणि परिस्थितीशी असा जोडला जातो की खेळता खेळता मुलांचे साहित्य असून ही तो त्यांना जीवनाच्या व्यापकतेशी जोडतो.*
शब्द आणि मुद्रित चित्र सगळ्यात खात्रीशीर आणि दीर्घकालीन परिणाम साधणारे साधन आहे.याची उत्तम जाण असणारे बाल साहित्यिक *सचिन बेंडभर* यांचा नुकताच प्रकाशित झालेला बाल कवितांचा संग्रह *वाघोबाचा मोबाईल* हे आनंद जैन यांच्या उदगाराचे उत्तम उदाहरण आहे.
९० टक्के आनंद तत्व देणाऱ्या या कविता संग्रहात एकूण १६ कविता आहेत आणि त्या सर्व सुचनात्मक बाल साहित्य प्रकारात मोडणाऱ्या आहेत. सूचनात्मक म्हणजे वास्तववादी तथ्य मांडणाऱ्या आहे …
असे म्हणतात की,बाल साहित्य लिहिण्यासाठी साहित्यिकाजवळ बाल मन असायला हवे बालकल्याणाची दृष्टी असायला हवी, जी सचिन बेंडभर यांच्याकडे पुरेपूर आहे. एका बी मध्ये भारी भक्कम झाड निर्माण करण्याची जी क्षमता असते ती सचिन बेंडभर यांच्या अंगी दिसून येते.या आधीच्या त्यांच्या बाल साहित्यावरून आपणास त्याचा अनुभव आला आहे.

आज काल मुलांना नैतिक शिक्षण देणारे अनेक बाल साहित्यिक बालसाहित्य लिहितात आणि ते मुलांच्या मनोविश्वाचा आणि मनो विश्लेषणाचा भाग होतात पण *वाघोबाचा मोबाईल* हा कविता संग्रह वाचल्यावर असे जाणवते की सचिन बेंडभर हे मनोविश्र्लेशना बरोबरच मुलांच्या मनोविज्ञानाचा ही विकास करतात मुलांबरोबर वावरताना त्यांच्यात चांगली जीवन मूल्ये निर्माण करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरतात.
सध्याच्या युगात मोबाईल क्रांती घडून आली आहे.त्या मोबाईलचा वापर करून त्यांनी *वाघोबाचा मोबाईल* ही शिर्ष्यस्थ बाल कविता लिहिली आहे.

*वाघ म्हणाला बछड्याचा*
*वाढदिवस साजरा करू*
*सगळे प्राणी बोलावू घरी*
*मोबाईल वर कॉल करू*

किती सहज आणि सुलभ ओळी आहेत या ?? विज्ञान अंगाई सारख्या..मोबाईल आणि वाढदिवस हा मुलांच्या मनो विज्ञानाशी निगडीत असलेला विषय आहे.त्याला प्राणी विश्वाची उत्तम जोड देत एका चांगल्या कवितेची निर्मिती केली आहे.

*हुशार कावळा* ही सुध्दा अशीच मनोवैज्ञानिक कविता आहे.या कवितेतील कावळा आपल्या काव काव मुळे लिमका बूक मध्ये नाव नोंदवायला निघाला आहे.

*तुम्हीच आता सांगायचं राव*
*फुकट नाही आमची काव काव*
*हुशार कावळा जगात नाव*
*लिम्का बुकात नोंदवा ठराव*

आजच्या वैश्विक जगात भारत एक शक्तिमान राष्ट्र म्हणून उभे करायचे असेल तर मुलांसाठी लेखन करणाऱ्या लेखक कवींना मुलांचे हे मनोविज्ञान ओळखता आले पाहिजे.
टच स्क्रीन मोबाईल / लॅपटॉप या सारख्या बाल मनोरंजनाच्या साधनांचे महत्त्व ओळखून बाल साहित्य लिहिले पाहिजे आणि सूचनात्मक साहित्याद्वारे मुलांना व्यावहारिक प्रवाहात आणले पाहिजे.. सूचनात्मक बालसाहित्य सदैव तत्थपुर्ण असले तरी त्यात रोचकता आणली तर मुले त्या साहित्याचा आवडीने स्वीकार करतात व्यावहारिक ज्ञानाबरोबर ते आनंद ही लुटतात.
भार नियमन हे विज्ञानाचे वास्तववादी तथ्य पाहून लहान मुलांना वेगळाच प्रश्न पडतो त्यांचे प्रश्नांकित मन काही ना काही नवे प्रश्न उभे करीत असतात तेंव्हा ते आपल्या आईला विचारतात.

*चंद्र आणि तारकांचे देव लावतो ना दिवे*
*कधी मधी का ग विझतात आहे तुला ठावे*
*आपल्या सारखे भार नियमन तेथे सुद्घा होई*
*ठाउक असेल तुला जर सांगशील का आई*

बाल साहित्याच्या प्रवाहात १९९० नंतरच्या कवींनी आपल्या कवितेच्या आविष्कार शैलीने वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे आशय आणि विषयात जगाच्या आणि बालकांच्या मनोविश्वात खूपसे बदल झाले आहे.अनेक संभावन्नांनी युक्त असलेली मुले माहिती करून घेऊन नवे शिकण्यासाठी आणि सृजन करण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्यात झालेले हे बदल अनेक कवींनी मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून टिपले आहे.तरीही अनेक कवी पुन्हा पुन्हा पारंपारिक आशय आणि विषयाकडे वळताना दिसून येतात.कवी सचिन बेंडभर सुध्दां त्याला अपवाद नाही *वाघोबाचा मोबाईल* या कविता संग्रहातील काही कविता या पारंपारिक आशय आणि विषयाच्या आहेत. आई..आजोबा.. आजोळ..मामा बाहुली.. बाळ. …चांदोबा…
पण या विषयाकडे सुध्दां कवी बाल मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहतो,हे कवींचे यश आहे कारण येथे आई आता मम्मी बनून येते.
*आईची माया….*
*…..सांगना मम्मी असते केवढी*

या कवितांचे प्रमुख वैशिष्ठ्य म्हणजे त्या अनुभव सिध्द /यथार्थ /आणि प्रामाणिक तथ्यांच्या आधारावर विषयांशी विवरण करीत मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा संतुलित विकास कसा होईल याचा विचार करतात आणि अवखळ चपळ नाविन्यपूर्णतेच्या शोधात असलेल्या मुलांना स्वभावानुसार पुढे जाण्याची अनुरूप संधी देतात.
सरळ/ सुबोध /विशद शब्द संपदावली / आणि सूचनात्मक वैज्ञानिक दृष्टीकोन यामुळे संग्रहातील कवितांना एक वेगळी उंची मिळाली आहे.एकूणच बाल रसिकांसाठी हा संग्रह म्हणजे एक उत्तम मेजवानी आहे.

[बालकाव्यसंग्रहाचे नाव- “वाघोबाचा मोबाईल”
कवी – सचिन बेंडभर
प्रकाशक- दिलीपराज प्रकाशन, पुणे]
punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 1 4 3
Users Today : 81
Users Yesterday : 503