पुणे प्रतिनिधी :
बऱ्याच वेळा प्रतिकूल परिस्थिती असल्यावर निराशाजनक सुरच नेहमी कानांवर पडतो, परंतु परिस्थिती पुढे हतबल न होता संकटांचा सामना करून जो परिस्थितीशी दोन हात करतो तोच जीवनात यशस्वी होतो, कोणतीही गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही. त्यासाठी अनेक दिवसांची तपश्चर्या लागते. साधना केल्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही, असे मत पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांनी आयोजित केलेल्या वढू बु. येथे श्रीशंभुचेतना शिबिरातील व्याख्यानमालेत कविता जगताना या विषयावर व्याख्यानाचे दुसरे पुष्प गुंफताना व्यक्त केले.
शिरूर तालुक्यातील वढू बु. येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर या वर्षी प्रथमच श्रीशंभुचेतना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यात प्रथमच लहान मुलांच्या शिबिराचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. या वर्षी व्याख्यानमालेचे हे पहिलेच वर्ष होते. वढू बु. येथील ग्रामस्थांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी सचिन बेंडभर यांना कविता जगताना या विषयावर सायंकाळी सहा वाजता आमंत्रित करण्यात आले होते. सुरुवातीला टाळ्यांच्या गजरात सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पुस्तक देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बेंडभर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कवितेचा प्रवास उलगडला. कविता कशी तयार होते? त्याची पार्श्वभूमी सांगत रोजच्या जगण्याच्या लढाईला कविता कशी बळ देते, हे समजावून सांगितले. त्याचप्रमाणे खचलेल्या मनाला उभारी देण्याचे काम कविता करते, हे सांगत असताना त्यांनी त्यांच्या येते जगाया उभारी या कवितेचे सादरीकरण केले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.
