मांडवगण फराटा प्रतिनिधी .
संतोष साळुंके
ऊसाच्या दरवाढीचा निर्णय कधी? शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदल्याची मागणी.
साखरेचे दर दिवसेंदिवस कडाडत आहेत, गुळाच्या दरातही वाढ होत आहे; मात्र ज्या उसापासून साखर आणि गूळ तयार होतो, त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या उसाच्या दराचे काय? असा संतप्त सवाल आता शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. बाजारात साखरेचा दर वाढत असताना ऊस उत्पादकाच्या हातात मात्र अपेक्षित मोबदला कधी येणार, याची प्रतीक्षा कायम आहे.

अलीकडे देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २० जुलैला साखरेचा दर सुमारे ४८.१८ रुपये किलो होता, तर त्यानंतरच्या काळात त्यात आणखी वाढ झाल्याचे वृत्त आहे.

केंद्र सरकारने २०२६-२७ हंगामासाठी उसाची एफआरपी ३६५ रुपये प्रतिक्विंटल निश्चित केली आहे. हा दर १०.२५ टक्के साखर उताऱ्यावर आधारित असून, मागील हंगामाच्या तुलनेत त्यात १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवीन एफआरपी १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहे.
मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न केवळ एफआरपीच्या आकड्यापुरता मर्यादित नाही. ऊस उत्पादनासाठी लागणारे खत, औषधे, पाणी, मजुरी, मशागत, तोडणी आणि वाहतूक खर्च सातत्याने वाढत आहेत. वर्षभर ऊसाची जोपासना करूनही बाजारातील साखर आणि गुळाच्या वाढत्या दराचा योग्य वाटा उत्पादक शेतकऱ्याच्या पदरात पडतोय का, हा खरा प्रश्न आहे.
“साखर महागली, गूळ महागला; मग ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या उसाचा दर कधी वाढणार?” असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
उसापासून साखरेबरोबरच इथेनॉल, मळी, सहवीजनिर्मिती आणि इतर उपपदार्थांची निर्मिती होते. त्यामुळे ऊसाच्या दराची निश्चिती करताना साखर उद्योगाला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाचा विचार करून उसाला अधिक योग्य भाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
आज प्रश्न फक्त दर वाढीचा नाही तर प्रामाणिक पणाने घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाच्या योग्य किंमतीचा आहे.





Users Today : 2
Users Yesterday : 237