वाघोली:प्रतिनिधी:विनायक साबळे
केसनंद ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात कथित बनावट व फेरफार केलेल्या वृत्तपत्रांच्या प्रती शासकीय अभिलेखात सादर केल्याच्या प्रकरणात संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भाजपा पंचायत समिती हवेलीचे सदस्य कुशाल गोरख सातव यांनी १४ ऑगस्टपासून पंचायत समिती हवेली येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाशी संबंधित शासकीय कागदपत्रांमध्ये २४ नोव्हेंबर २०२५, १८ डिसेंबर २०२५, ७ एप्रिल २०२६ आणि ८ एप्रिल २०२६ रोजीच्या कथित बनावट अथवा फेरफार केलेल्या वृत्तपत्रांच्या प्रती जोडण्यात आल्याचा आरोप सातव यांनी केला आहे.

या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर संबंधित वृत्तपत्र कार्यालयाने वाघोली पोलिस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित जाहिर निविदा व वृत्तपत्रांच्या प्रती बनावट असल्याचे स्पष्ट केल्याचे सातव यांनी सांगितले आहे. तसेच पंचायत समितीच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी पंचायत यांनी प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर केला असून, शासकीय दस्तऐवजांमध्ये कथित खोटी व बनावट कागदपत्रे समाविष्ट केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे सातव यांनी निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणात संबंधित ग्रामसेवक, व इतर दोषींवर कोणताही विलंब न करता गुन्हा दाखल करावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सातव यांनी केली आहे.

१४ ऑगस्टपूर्वी कारवाई न झाल्यास पंचायत समिती हवेली येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. शासकीय अभिलेखात बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचा आरोप गंभीर असून, या प्रकरणात राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात प्राथमिक चौकशी अहवाल, संबंधित वृत्तपत्रांच्या प्रती, निविदा कागदपत्रे, पोलिसांकडील निवेदन तसेच अन्य उपलब्ध पुरावे प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचे सातव यांनी सांगितले आहे.
प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे हवेली तालुक्याचे लक्ष लागले आहे.





Users Today : 166
Users Yesterday : 99