पुणे प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) धर्तीवर आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मध्येही अशा मृत आंदोलकांच्या कुटुंबातील एका अवलंबितास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री यांच्या २७ मे २०२६ च्या पत्राचा तसेच २४ मार्च २०२६ रोजी झालेल्या ४१० व्या संचालक मंडळ बैठकीतील निर्णयाचा संदर्भ या आदेशात देण्यात आला आहे.

वारसांची शहानिशा करून प्रमाणपत्र देणार:
शासन आदेशानुसार, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील पात्र वारसांची योग्य पडताळणी करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र देणे आवश्यक राहणार आहे. हे प्रमाणपत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कडून अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा प्रकरणांची अचूक, पारदर्शक आणि गतीमान पद्धतीने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र वारसांना अधिकृत प्रमाणपत्र तातडीने निर्गमित करून देण्याची कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.
आंदोलनग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा:
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान विविध ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या निर्णयामुळे संबंधित कुटुंबातील एका अवलंबित सदस्याला रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक स्थैर्यास मदत होणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आंदोलनग्रस्त कुटुंबांना न्याय देण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.






Users Today : 4
Users Yesterday : 57