सरदवाडी प्रतिनिधि :-दत्तात्रय कर्डिले.
शिरूर, रांजणगाव एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक तीन मधील कर्डे घाट परिसरातील औद्योगिक वसाहतीसाठी वीजवाहिन्या टाकण्याच्या कामास स्थानिक बाधित शेतकऱ्यांनी आज तीव्र विरोध दर्शविला. या कामातील अनेक खांब आमच्या खासगी जागेत व रस्त्यावर येत असल्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा आक्षेप होता. दरम्यान, स्थानिकांना पांगविण्यासाठी पोलिस बळाचा वापर झाल्याने व काहींची धरपकड केल्याने तणाव पसरला.
एमआयडीसीसाठी विद्युत वाहिनी टाकताना अनियमीत पद्धतीने खांब उभारले आहेत. यातील अनेक खांब हे रस्त्याकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतजमीनीत तर काही खांब रस्त्यात उभारले जात असल्याची स्थानिकांची तक्रार असून स्थानिक शेतकऱ्यांचा या कामाला विरोध आहे. खांब न उभारता भूमीगत वीजवाहिनी टाकावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
अनेक शेतकरी व पदाधिकारी रोडवर:
दरम्यान, आज सकाळी न्हावरे फाटा, कर्डे घाट परिसरात हे काम सुरू होताच सरदवाडी, न्हावरे फाटा, घावटे मळा येथील शेतकऱ्यांनी विरोध केला. हिरकणी प्रतिष्ठान च्या अध्यक्षा तृप्ती सरोदे, सरदवाडीचे माजी उपसरपंच व विद्यमान कृष्णा घावटे, योगेश कर्डिले, ॲड. निनाद मगर, दिपक सरोदे, सुभाष सरोदे, सुयश घावटे, सुजाता सरोदे, छाया सरोदे आदींनी तीव्र विरोध दर्शविला. त्यावेळी पोलिसांशीही शेतकऱ्यांची बाचाबाची झाल्याने आंदोलनस्थळी तणाव पसरला. दरम्यान, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी अधिकची कुमक बोलावून शेतकऱ्यांना बाजूला घेण्याचा प्रयत्न केला.
शिरूर पोलीसांची मनमानी:
त्यावेळी शेतकरी आणखी आक्रमक झाले. ॲड. मगर यांनी खांब उभारणीचे काम करू न देण्याचा पवित्रा घेतल्याने केंजळे यांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले व शिरूर पोलिस ठाण्यात आणले. यावेळी ॲड. मगर यांना अटक झाल्याची वार्ता पसरल्याने स्थानिक शेतकरी आंदोलकांसह शहर व परिसरातील वकील मोठ्या संख्येने जमा झाले. ॲड. संजय वाखारे, ॲड. शिरीष लोळगे यांच्यासह वकीलांनी केंजळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याने पोलिस ठाण्यासमोरही तणावाचे वातावरण निर्माण झाले. केंजळे यांनी धक्काबुक्की करून आपल्या वकील पदाची अप्रतिष्ठा केल्याचा आरोप ॲड. मगर यांनी केला. तृप्ती सरोदे यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. महिला पोलिस हवालदार यांनी आंदोलक महिलांशी गैरवर्तन केल्याचा, आरेरावी केल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, ॲड. मगर यांना नोटीस देऊन सोडून दिले.
विकासच्या नावाखाली जमीन बळकावणे सुरू :
विकासाच्या नावाखाली शासनाला आमच्या हक्काच्या शेतजमीनी बळकावू देणार नाही, असा निर्धार ॲड. मगर यांनी व्यक्त केला. सामान्य शेतकरी आपली हक्काची बाजू मांडत असताना पोलिस बळाचा वापर करणे आणि सामान्यांच्या भावना चिरडून टाकण्याचा हा प्रकार निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून परत विद्युत वाहिनीचे काम रेटण्याचा प्रयत्न झाल्यास स्थानिकांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी दिला.
कर्डे घाट परिसरात एमआयडीसीसाठी विद्युत वाहिनीचे काम थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन शिरूर पोलिस ठाण्यात आणल्याने तणाव पसरला. यावेळी स्थानिकांनी पोलिसांसमोर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
