शिरुर प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपूर्वी मे. कोर्टाचे अखत्यारिकेतील जन्म व मृत्यू नोंदीबाबत व सदरचे दाखले देत असलेले सर्व अधिकार हे प्रांत कार्यालयास दिलेले असून तेव्हा पासून याबाबतची जन्ममृत्यूची नोंदी करण्याचे व जन्म मृत्यू दाखला देण्याचे सर्व अधिकार प्रांत कार्यालयास प्राप्त झालेले आहेत.
परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व वकील मंडळींना, नागरिकांना, वयोवृद्ध माणसांना तसेच पालकांना या जन्माच्या दाखल्यासाठी तसेच मृत्यूच्या दाखल्यासाठी त्या कार्यालयात अनेक चक्रा माराव्या लागत आहेत. तरी देखील त्यांचे जन्म मृत्यू नोंदणी बाबत तसेच सदरचे दाखले बाबत कुठलीही ठोस पावले उचलून अथवा सुनावणी नोटीस बजावणी होऊन पुढील कार्यवाही देखील होत नाही, असे माळवे यांनी म्हंटले आहे
त्यामुळे संबंधित सर्व नागरिक, वकील मंडळी,जेष्ठ नागरिक व पालक यांना खूप मोठ्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच प्रांत कार्यालयातून असे देखील समोर आले आहे की, गेल्या सहा – सात महिन्यांपासून नागरिकांनी अनेक अर्ज तसेच त्या संबंधित असणारी सर्व कागदपत्रे देऊन देखील ही नागरिकांना आपले कार्यालयातून मिळणारी नोटीस व ज्या तारखेस होणारी सुनावणी नोटीस ही आर्थिक तडजोड केल्याशिवाय मिळत नाही,
तसेच संबंधित अधिकारी यांना लक्ष्मी पावले शिवाय नागरिकांना नोटीसा दिल्या जात नाहीत अशी खंत देखिल ॲड. स्वप्निल किशोर माळवे यांनी व्यक्त केली आहे.
सदरची बाब अत्यंत गंभीर असून याच्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तसेच नागरिकांचे त्यांच्या चाललेल्या दाव्याप्रति त्यांच्या चाललेल्या, नोंदी प्रती, त्यांच्या चाललेल्या महसूलच्या कामाप्रती, कोणतेही काम होत नसल्याचे दिसून येत आहे व याच्यामुळे त्यांना खूप मोठ्या आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे त्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान होत आहे.
यातच अनेक वयोवृद्ध नागरिक आपले कार्यालयात अनेक महिन्यांपासून वेळोवेळी पाठपुरावा करीत आहेत. वेळोवेळी आपल्या चपला झिजवून अनेक त्रासाला सामोरे जाऊन ७० ते ७५ किलोमीटर प्रवास करून आपले कार्यालयात संबंधित नोटीस घेण्यासाठी येत आहेत. परंतु त्यांना सदरची नोटीस देखील दिली जात नाही ही खूप मोठी लाजिरवाणी बाब आहे.
सदरची सुनावणी नोटीस न मिळाल्याने अनेक नागरिक त्रस्त झालेले आहेत, व त्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होऊन, खूप मोठ्या आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सदर विषयांमध्ये आपण गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन यावर तात्काळ पुढील कार्यवाही करून येत्या सात दिवसात जन्ममृत्यूच्या नोंदी बाबत योग्य ती कार्यवाही करून आपले कार्यालयातील संबंधित अधिकारी यांना त्वरित सर्वच्या सर्व सुनावणी नोटीसा बजावणी करण्याचे आदेश द्यावेत व नागरिकांना पालकांना, जेष्ठ वृद्धांना लागणाऱ्या जन्ममृत्यूच्या दाखल्यांची कोणताही त्रास न होता एका तारखेमध्ये त्यांच्या कागदपत्रांची संपूर्ण शहानिशा करून जन्म मृत्यूचे दाखले देण्यात यावे व तसेच नोंदी घालण्याचे आदेश देखीलपारित करण्यात यावे, अशी विनंती ॲड. माळवे यांचेकडून निवेदनाद्वारे उपाधिकारी पुणे यांना करण्यात आली आहे.
अन्यथा सदरच्या असलेल्या नागरिकांच्या मोठ्या प्रश्नासाठी आम्हास जनआंदोलन उभे करावे लागेल, याची नोंद घ्यावी. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण व आपले कार्यालय जबाबदार राहील. असा इशारा देखिल यावेळी देण्यात आला आहे..
