पुणे प्रतिनिधी : सागर पवार
मुलांच्या भाषेतील साहित्य मुलांसाठी वाचनीय व्हावे व वाचनाचा आनंद विद्यार्थ्यांना मिळावा तसेच वाचनाचा कल वाढावा त्याकरीता विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी कायम लिहिते राहावयास हवे असे मत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बाळकृष्ण वाटेकर यांनी व्यक्त केले.
भाषा विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर क्षीरसागर यांनी देखील प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांचे अनुभव विश्वातील गोष्टी पुस्तक रूपाने विद्यार्थ्यांच्या समोर जावेत याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या कार्यशाळेच्या नेमक्या हेतू विषयी मार्गदर्शन केले.
भाषा विभागाच्या उपविभाग प्रमुख श्रीमती वैशाली बच्छाव, अधिव्याख्याता यांनी वयोगटानुसार व SCERT ने ठरवून दिलेल्या निकषानुसार पुस्तक कशा पद्धतीने लिहावे यासंदर्भात उपस्थिताना मार्गदर्शन केले.
साहित्य समजून घ्यायचे असेल तर मन संवेदनशील असावे लागते. साहित्यातूनच शब्दांचे सौंदर्य वाढते. मराठी साहित्यात प्रसंगानुरूप, आरोह अवरोह, विराम चिन्हे यांनुसार वाक्याचे अर्थ बदलत राहतात. त्यामुळे मराठी साहित्यात या गोष्टींना विशेष महत्त्व आहे, असे मत आजच्या कार्यशाळेला लाभलेले सुलभक तसेच शिक्षक सचिन बेंडभर यांनी नवोदित साहित्यिक शिक्षकांना साहित्यातील शब्दांचे सौंदर्य समजून घेणे किती आवश्यक आहे व त्या करीता दैनंदिन सर्व अनुभवांचे लेखन हे रोजच्या अध्यापनाबरोबरच कशाप्रकारे करता येऊ शकते यासंदर्भात मार्गदर्शन केले.
तसेच सुलभक म्हणून लाभलेले संदीप वाकचौरे यांनी विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार साहित्य निर्मिती करताना कोणती काळजी, संदर्भ कशाप्रकारे लिहावेत ,तसेच बोली भाषेचा वापर हा मुलांना वाचन संस्कृतीकडे घेऊन जाणारा कसा असावा? याविषयी शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
LFE संस्थेच्या श्रीमती वृषाली पाठक देखील सदर कार्यशाळेत उपस्थित होत्या.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी आयोजित केलेल्या समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रम सन 2024- 25 साठी ग्रंथालय पुस्तक निर्मिती कार्यशाळेचे आभार प्रदर्शन श्रीमती राजश्री तिटकारे, अधिव्याख्याता ,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी व्यक्त केले.
