धाराशिव येथील प्रा. अलका सपकाळ या सांगली येथील रयत शिक्षण संस्थेत अध्यापनाचे कार्य करत आहेत. फुलांची शाळा हा त्यांचा तिसरा बालकाव्यसंग्रह आहे. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सपकाळ यांना अनेक नामवंत शैक्षणिक व साहित्यिक संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. आपल्या व्याख्यानातून ते युवा पिढीला सतत मार्गदर्शन करत असतात. दिलीपराज प्रकाशनकडून नुकताच त्यांचा फुलांची शाळा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे आणि त्याला महाराष्ट्रातील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
फुलांची शाळा या बालकाव्यसंग्रहात एकूण 30 कवितांचा समावेश आहे. झाड ,पक्षी, पाऊस, फुले, प्राणी आणि नाते अशा मुलांच्या भाव विश्वातील साध्या सोप्या विषयांवर कवयित्रीने खुबीने कविता केलेल्या आहेत. सर्वच कविता वाचणीय असून जीवन जगण्याचा छान संदेश त्यातून त्यांनी दिलेला आहे.
प्रा. अलका सपकाळ यांचे बालपण खेड्यापाड्यात गेलेले आहे. झाडे वेली, पशुपक्षी आणि नात्यागोत्यांमध्ये वापरल्याने त्यांचे अनुभव विश्व समृद्ध आहे. त्यामुळे शेत शिवार, ऊन वारा, पाऊस या गोष्टी त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत. एकत्र कुटुंबात वावरत असल्याने नाती जपणे व टिकवणे याची त्यांना चांगली माहिती आहे. लहानपणापासूनच त्यांच्यावर वाचनाचे संस्कार झाले असल्याने साहजिकच त्यांच्या लेखनामध्ये कमालीची प्रगल्भता जाणवते. कैऱ्या चिंचा पाडणे, सुरपारंब्या खेळणे, आजोबांचा हरिपाठ ऐकणे, थोरामोठ्यांच्या गोष्टी ऐकणे, देवळात भजन कीर्तन ऐकणे आणि पाळीव प्राण्यांविषयी असलेला लळा या गोष्टींमुळे त्यांच्या कवितेतून माणुसकीची झालर आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या कविता संस्कारांचा वसा व वारसा जपताना दिसतात. त्यामुळे पुढील पिढी वाचनातून अनुभव संपन्न व संस्कारक्षम होईल हे चित्र त्यांच्या बालसाहित्यात निश्चितपणे जाणवते.
फुलांची शाळा या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता आपले वेगळेपण जपणारी आहे. मुलांचे भाविश्व विचारात घेऊन त्या तयार केलेल्या आहेत. त्यामुळे या कविता मनोरंजना बरोबर निखळ आनंद देतात. ढगाचा कोट या कवितेत कवयित्री म्हणते,
*अगडबंब अगडबंब*
*ढगा तुझं पोट*
*कसा शिवू मी तुला*
*छान छान कोट*
*टेलरदादा टेलरदादा*
*माप तेवढं घ्या*
*हात माझा पोचत नाही*
*खाली थोडे या*
*ओढून घ्या पोट*
*नाही तर पाणी खाली लोट*
मुलांच्या कल्पनाशक्तीला अनुसरून या कविता तयार केल्याने ते नकळतपणे पुस्तकाशी खिळवून राहतात. मुळातच ढगाचा कोट ही भन्नाट कल्पना आहे. मुलांना या कल्पनेत रमण्यात आवडते. त्यांना काय पाहिजे ते नेमके कवयित्रीला ठाऊक असल्याने या कविता या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या आहेत.
दुखवटा या कवितेत कवयित्रीने पक्ष्यांच्या मूक भावनांचे वर्णन केले आहे तर वृक्षदिंडी या कवितेत जंगल, प्राणी, पक्षी, झाडे, वेली यांना जपण्याचा संदेश या दिला आहे. त्यामुळे त्यांच्या कविता केवळ मनोरंजन करत नाही तर निसर्ग जपण्याचा मोलाचा संदेश देतात.
किल्ला या कवितेतून मुलांनी दिवाळीच्या सुट्टीत कशाप्रकारे किल्ला बांधला. त्या किल्ल्याचे वर्णन अतिशय सुंदर केले आहे.
तर परतीच्या पावसा या कवितेत सायकलवर चाललेल्या मुलाच्या भावनांचे कवयित्रीने अतिशय सुंदर वर्णन केले आहे. ती त्यात म्हणते,
*परतीच्या पावसा*
*जा ना रे परतून*
*वाट पाहत नाही का*
*तुझी रे कोण*
*रस्त्यावर होतो*
*सगळा चिखल*
*कशी चालवू सांग*
*मी माझी सायकल*
रस्त्यावर चिखल होतो म्हणून सायकल चालवता येत नाही या मुलाच्या निरागस भावना कवयित्रीने खूप सुंदर आणि समर्पक शब्दात टिपलेल्या आहेत. यात कुठेही शब्दांचा बडेजावपणा नाही की बाष्कळपणाला वाव नाही. अगदी जे मनात आहे तेच ओठावर आलेलं दिसतं त्यामुळे या कविता सहजच काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. इतक्या त्या वाचकाला आपल्या करून जातात.
पुणे येथील माननीय मोहित राजीव बर्वे यांच्या नावाजलेल्या दिलीपराज प्रकाशनने या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो. प्रसिद्ध चित्रकार माननीय श्री. संतुक गोलेगावकर, यांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ व आतील प्रसंगाला अनुरूप साजेशी चित्रे पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकते. ज्येष्ठ साहित्यिक राजन लाखे यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. तर साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्राप्त कवी एकनाथ आव्हाड यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. प्रा. अलका सपकाळ यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा..!
सचिन बेंडभर पाटील
कार्यकारणी सदस्य,
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे.
