महाराष्ट्रातील प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड हे मुलांचेच नव्हे तर बालसाहित्यिकांचेही आवडते कवी आहेत. बाल साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास असून लहान मुलांसाठी त्यांनी आजपर्यंत अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या शब्दांची नवलाई या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बालसाहित्यचा पुरस्कार आहे. तर छंद देई आनंद या पुस्तकाला 2023 सालचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्राप्त आहे. याशिवाय त्यांच्या अनेक कथा आणि कवितांचा समावेश महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळाने विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकात केला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे ते एकेकाळी सदस्य राहिले आहेत.अशा अनुभव संपन्न बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचा छंद देई आनंद हा बालकाव्यसंग्रह म्हणजे मुलांना आनंदाची पर्वणीच..!
2023 सालचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्राप्त बालकाव्यसंग्रह म्हणजे एकनाथ आव्हाड यांचा छंद देई आनंद होय. दिलीपराज प्रकाशनची साजेशी बांधणी, सागर नेणे यांचे आकर्षक मुखपृष्ठ व समर्पक चित्रे, लक्ष्मीकांत देशमुख यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि लहान मुलांना अनुसरून निवडलेले साधे सोपे विषय व कवितांची आकर्षक मांडणी हे त्यांच्या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे.
या काव्यसंग्रहात एकूण 42 कवितांचा समावेश आहे. सर्वच कविता वाचनीय असून मुलांच्या वयोगटाला अनुसरून त्या तयार केलेल्या आहेत. निसर्ग, खेळ, मित्र, नातं, शाळा, संगीत, प्राणी, तंत्रज्ञान आणि राष्ट्रभक्ती अशा वेगवेगळ्या विषयांवर या कविता तयार केलेल्या आहेत. या सर्वच कविता मुलांच्या भाविश्वाशी निगडित असल्याने त्या त्यांना आपल्याशा वाटतात इतकेच नव्हे तर मोठ्या माणसांनाही खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्या प्रत्येक बाल कवितेत आहे. त्या वाचताना कोणीही अगदी लहान होऊन जातो. इतक्यात त्या सहजतेने तयार झालेल्या आहेत.
या काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेतून चांगला प्रेरणादायी संदेश दिला आहे. मॉनिटर या कवितेतून वर्गाचे कामकाज व्यवस्थित पाहणाऱ्या गुन्हे विद्यार्थ्यांची वर्णन यात केले आहे. गुजगोष्टी या कवितेत फुलांविषयी माहिती देऊन प्रत्येक फुलातील गुणांचे वर्णन केले आहे. तर शाबासकी या कवितेत पोहण्याची आवड असलेल्या मुलाचे वर्णन करून छंद माणसाला जगायला शिकवतो. तसेच इतरांना मदत करायलाही शिकवतो याचं वर्णन करून जर छंद जिवापाड जपला तर तो आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण करतो हे कवी आवर्जून या ठिकाणी सांगतो.
शोधू आनंदाच्या वाटा या कवितेत रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे कवीने छानसे वर्णन कवितेत केले आहे. यातून मनोरंजना बरोबरच ज्ञान देण्याची कार्यही कवीने नकळतपणे केले आहे.
तो त्यात म्हणतो,
*रायगड मधील थंड हवेचे*
*ठिकाण माथेरान*
*वृक्षराजींसोबत मस्तच*
*प्रसन्न हवामान*
*रायगड मधील वरदविनायक*
*मंदिराचा अनोखा थाट*
*आजूबाजूचा प्रदेश सारा*
*होईल लगेच तोंडपाठ*
पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगताना कवी विरंगुळा या कवितेतून म्हणतो,
“पुस्तक हातात पडताच
नसतो मी माझा
वेगवेगळ्याच अद्भुत विश्वाचा,
मी होऊन जातो राजा”
“विरंगुळ्याचे क्षण माझे
पुस्तकांनी होती गंधित
लिहितो मी कथा कविता
माझ्याच आगळ्या धुंदीत”
छंदात माणूस किती गुरफटून जातो हे विरंगुळा या कवितेतून कवीने छान सांगितले आहे. तसेच या कवितेतून कथा कविता लिहिण्याचा संदेशही कवीने दिला आहे.
प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. तो छंद जपला पाहिजे असे कवी या ठिकाणी म्हणतो. छंद आपल्याला जगण्यावर प्रेम करायला शिकवतात. एक नवी दृष्टी देतात. आयुष्यात छंद नसेल तर जीवन यांत्रिक होईल आणि ते निरस वाटू लागेल. मग आपोआपच नैराश्य येईल. वैफल्यग्रस्त व्यक्ती आत्मघातास प्रवृत्त होतो. हे टाळायचे असेल तर प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद पाहिजे. संगीत, नाटक, नृत्य, अभिनय, साहित्य, कला, पोहणे आणि मैदानी खेळ यापैकी आपल्याला ज्या गोष्टीत रस आहे ती गोष्ट आपण छंद म्हणून जोपासली पाहिजे, असा संदेश छंद देई आनंद या काव्यसंग्रहमार्फत कवीने नकळतपणे पोहोचवला आहे.
पुणे येथील मोहित राजीव बर्वे यांच्या नावाजलेल्या दिलीपराज प्रकाशनने या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो. प्रसिद्ध चित्रकार सागर नेने, यांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ व आतील प्रसंगाला अनुरूप साजेशी चित्रे पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकते. माजी सनदी अधिकारी व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष माननीय श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. एकनाथ आव्हाड यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी सचिन बेंडभर यांनी हार्दिक दिल्या.
