वाघोली.प्रतिनिधी: विनायक साबळे
पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील वाघोली येथील एका नामांकित ज्वेलरी शोरूमने उभारलेल्या अतिप्रखर एलईडी जाहिरात फलकामुळे हजारो वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा गंभीर आरोप माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी केला आहे. रात्रीच्या वेळी या फलकातून पडणारा तीव्र प्रकाश थेट वाहनचालकांच्या डोळ्यांवर आदळत असल्याने काही क्षणांसाठी दृष्टी पूर्णपणे दिपत असून, हा फलक अक्षरशः ‘अपघाताला निमंत्रण’ देत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

महामार्गावर वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर अचानक पडणाऱ्या या प्रखर प्रकाशामुळे समोरील रस्ता, इतर वाहने, पादचारी किंवा दुभाजक स्पष्ट दिसत नसल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. विशेषतः दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका चालक आणि रात्री लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी हा एलईडी फलक धोकादायक ठरत असल्याची चर्चा आहे.

चंद्रकांत वारघडे यांनी प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “हजारो वाहनांची सतत वर्दळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत इतका प्रखर प्रकाशाचा फलक उभारला जातो, तरीही संबंधित यंत्रणा गप्प का?” असा सवाल केला आहे.त्यांनी पुणे शहर वाहतूक विभाग आणि पुणे महानगरपालिका आकाश चिन्ह विभागाने तातडीने या ठिकाणी संयुक्त पाहणी करून संबंधित ज्वेलरी व्यावसायिकाला नोटीस बजावण्याची, एलईडी फलकाची प्रकाशतीव्रता तात्काळ कमी करण्याची आणि वाहतूक सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या अशा फलकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

“जाहिरातीच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. एखादा मोठा अपघात घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा आताच कारवाई करणे गरजेचे आहे.

रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरणाऱ्या अशा एलईडी जाहिरात फलकांवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी आता वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडूनही जोर धरू लागली आहे.
याबाबत संबंधित व्यावसाय व्यवस्थापनाची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही





Users Today : 127
Users Yesterday : 79