शिरूर प्रतिनिधी:
शिरूर शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने बलिदान मासानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, नागरिक व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या ३० दिवसांच्या कालावधीत शहरातील असंख्य युवक व नागरिक बलिदान मास पाळत आहेत.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा बलिदान मास पाळला जातो. शंभूराजे तीस दिवस मृत्यूच्या वाटेवर होते, त्या स्मरणार्थ नागरिक या काळात सुतक पाळत असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कालावधीत सहभागी व्यक्ती दिवसातून एकच वेळ भोजन करतात, पायात चप्पल घालत नाहीत, गोडधोड पदार्थांचा त्याग करतात तसेच साधे जीवन जगतात. अनेक जण मुंडन करून शेंडी ठेवतात व घरामध्ये शंभूराजांचा फोटो लावून त्यासमोर अखंड दिवा प्रज्वलित ठेवतात.
दररोज सायंकाळी सात वाजता पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथे शंभूराजांची प्रार्थना केली जाते. या प्रार्थनेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे.
फाल्गुन अमावस्या, म्हणजेच मृत्युंजय अमावस्या, या दिवशी श्रीक्षेत्र वडू येथून धर्मवीर ज्वाला शिरूरमध्ये आणण्यात आली. त्यानंतर शहरात मूकपदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ही मूकपदयात्रा म्हणजे शंभूराजांची त्या काळात न निघालेली अंत्ययात्रा असल्याचे मानले जाते.
या मुकपदयात्रेतही शिरूरकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शंभूराजांना भावपूर्ण अभिवादन केले. संपूर्ण शहरात या उपक्रमामुळे श्रद्धा, शौर्य आणि इतिहासाची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.





Users Today : 28
Users Yesterday : 92