शिरूर प्रतिनिधी:
पुणे अहिल्यनगर महामार्गावरील 53.4 किमी लांबीच्या उड्डाणपूल मार्गाच्या बहुप्रतिक्षित कामाला अखेर गती मिळत आहे.
या प्रकल्पाच्या आर्थिक निविदा उघडण्यात आल्या असून, प्रशासकीय प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.
त्यामुळे पुणे शिरूर मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाहतुकीचा प्रचंड ताण नागरिक त्रस्त
शिरूर ते पुणे प्रवास हा गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
रांजणगाव MIDC, सणसवाडी, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती असल्याने पुणे ,नगर रोडवर सतत वाहतुकीचा प्रचंड ताण जाणवतो.
दररोज हजारो कामगार, मालवाहतूक वाहने आणि पुण्याकडे जाणारे प्रवासी या रस्त्यावरून प्रवास करत असल्याने येथे मोठमोठ्या रांगा, अपघात, वेळेचा अपव्यय आणि प्रदूषण वाढल्याचे दृश्य दिसत आहे.
राजकीय अडथळ्यांमुळे प्रकल्प रखडला
या महत्त्वपूर्ण महामार्ग व उड्डाणपूल प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून अनेक वेळा निविदा मागवण्यात आल्या.
मेट्रो कनेक्टिव्हिटीसह आधुनिक DPR मंजूर केले गेले; मात्र विविध राजकीय हस्तक्षेप, बदलणारे प्रस्ताव आणि प्रशासकीय विलंब यामुळे प्रकल्प वारंवार रखडत गेला.
माऊली आबा कटके यांचा आग्रह
शिरूर–हवेली मतदारसंघाचे आमदार माऊली आबा कटके यांनी गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
मुंबईतील उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी रस्त्याची धोकादायक स्थिती, वाहतुकीची कोंडी, औद्योगिक विकासातील अडथळे आणि शिरूर–पुणे प्रवासाची बिकट अवस्था याबाबत सविस्तर माहिती सादर केली.
त्यांच्या पाठपुराव्या नंतर प्रकल्पाच्या आर्थिक निविदा उघडणे, हा निर्णायक टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे पुढील तांत्रिक पडताळणी केली गेल्यानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता अधिक मजबूत झाली आहे.
नागरिकांमध्ये समाधानाची भावना
या घडामोडींमुळे शिरूर, सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव MIDC परिसरातील नागरिक आणि उद्योगसमूहांत समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
उड्डाणपूल व सुधारित महामार्ग पूर्ण झाल्यानंतर,
शिरूर–पुणे प्रवास वेळ 30-40 मिनिटांनी कमी होईल.
अपघातांचे प्रमाण घटेल.
औद्योगिक वाहतुकीला वेग
पुणे–नगर मार्गावरील शहरांतील आर्थिक विकासाला चालना मिळेल.
राज्य सरकार स्तरावर सर्व प्रक्रिया पूर्ण होत असल्याने 2026 च्या सुरुवातीस काम सुरू होईल, असा अंदाज बांधला जात आहे. ठेकेदार निवड, अंतिम प्रशासकीय मंजुरी आणि निधी वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कामाला गती मिळणार आहे.






Users Today : 6
Users Yesterday : 7