कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे)
राज्यात गेल्या १५ वर्षांपासून माहिती अधिकाराचा वापर करून विविध घोटाळे उघडकीस आणणारे माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गोविंद वारघडे यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करत एक निवेदन सादर केले आहे. वारघडे यांनी म्हटले आहे की, त्यांचे जीवित धोक्यात असूनही पोलिस संरक्षण वारंवार मागणी करूनही नाकारले जात आहे. भविष्यात काही अनर्थ घडल्यास याला जबाबदार कोण असेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
वारघडे हे हवेली तालुक्यातील बकोरी येथील रहिवासी असून ते माहिती सेवा समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यासारख्या विविध सामाजिक संस्थांचे संस्थापक आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मुंबई उच्च न्यायालयात माझ्याकडून भ्रष्टाचारविरोधात दाखल केलेले काही खटले सुरू आहेत. मी आतापर्यंत अनेक घोटाळे बाहेर काढले असून त्यामुळे मला वेळोवेळी धमक्या येत आहेत. या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मी पूर्वी तीन वर्षे पोलिस संरक्षणाखाली होतो. मात्र ते अचानक काढून घेण्यात आले.
वारघडे यांनी स्पष्टपणे सांगितले की, पोलिस संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी पुणे पोलिस आयुक्त कार्यालयासह स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये वेळोवेळी अर्ज केले, जबाब दिले आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली. तरीदेखील त्यांचे अर्ज वारंवार फेटाळले गेले. त्यामुळे आता ते पोलिस संरक्षणाची मागणी करत नसून, भविष्यात त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी पुणे पोलिस आयुक्त, पोलिस संरक्षण घटीत समितीतील सदस्य, झोन ४ चे पोलिस उपायुक्त, तसेच वाघोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्यावर राहील, असा इशारा त्यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.
या प्रकरणाची प्रत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक, मानवाधिकार आयोग, मुंबई उच्च न्यायालय व पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे.
