शिरूर प्रतिनिधी :–
साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर संपादित विद्यार्थ्यांच्या स्वनिर्मित कवितांचा परीसस्पर्श हे पुस्तक वाचनीय असून अशा उपक्रमातून भविष्यकाळात अनेक कवी लेखक घडतील असा विश्वास वाटतो, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.
शैक्षणिक गुणवत्ता विषयक उपक्रमांसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, यांनी शिक्षण आयुक्त सच्चींद्रप्रताप सिंग, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, डाएटचे प्राचार्य नामदेव शेंडकर आणि राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक यांना एकत्रितपणे चर्चासत्रासाठी आमंत्रित केले होते.
यावेळी पुण्यात विधान भवन येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांसंदर्भात महत्वाची बैठक पार पडली.
यावेळी बेंडभर यांनी विद्यार्थ्यांच्या संदर्भात बालसाहित्याची भूमिका मांडली. विद्यार्थ्यांना अवांतर वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांची लेखन कला विकसित होण्यास मदत होईल.
तसेच पुढील काळात त्यांच्याकडून दर्जेदार साहित्य निर्मिती होईल. विद्यार्थ्यांकडून स्वनिर्मित कथा आणि कवितांची निर्मिती करून घेतली असून मनातल्या कविता, शिंपल्यातले मोती आणि परिसस्पर्श अशी तीन पुस्तके त्यांनी संपादित केली आहेत. मुलांना वाचनाची आवड निर्माण करून त्यांना लिहिते करण्यासाठी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेकडून विविध उपक्रमांतून आम्ही प्रयत्न करत आहोत.
बालकुमार साहित्य संस्थेकडून नुकताच मुलांचा प्रकाशित केलेला कथापंचक हा कथासंग्रह याचेच एक उदाहरण आहे. विद्यार्थ्यांमध्ये साहित्य विषयक गोडी निर्माण केली पाहिजे, साहित्य समाज घडवतो, आपली संस्कृती जपतो. संवेदनशील मने जपण्यासाठी साहित्य आवश्यक आहे. कारण साहित्य आपले जीवन समृद्ध करते, असे मत यावेळी बेंडभर यांनी व्यक्त केले.
