मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके :
मराठी साहित्यात एक आगळावेगळा प्रयोग म्हणून ओळख मिळवणाऱ्या ‘कथा मनातली’ या कथा संग्रहाचे प्रकाशन रविवारी पुण्यातील पत्रकार भवन येथे दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. प्रा. अविनाश फडतरे संपादित या पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीरचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यात बोलताना अध्यक्ष भारत सासणे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “नवोदित आणि लिहित्या हातांना मोकळेपणा देऊन त्यांच्याकडून उत्तम, सकस आणि दर्जेदार लेखन घडवून आणणे हीच खरी साहित्य चळवळ आहे. अशा उपक्रमांमुळे साहित्याचा पाया अधिक भक्कम होतो आणि नवीन लेखकांना व्यासपीठ मिळते.” वाचकांच्या अनुभवांना, भावविश्वाला आणि सत्य घटनांना साहित्यिक अभिव्यक्ती देणारा ‘कथा मनातली’ हा संग्रह मराठी साहित्यातील एक वेगळा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास सासणे यांनी व्यक्त केला. वाचकांनाच साहित्यनिर्मितीच्या केंद्रस्थानी आणणारा हा उपक्रम मराठी साहित्याच्या लोकाभिमुख परंपरेला अधिक बळ देणारा ठरेल.

या संग्रहाची विशेषता म्हणजे तो नामवंत साहित्यिकांच्या नव्हे, तर ‘वाचकांनी लिहिलेल्या सत्यकथां’चा ‘वालीस कथा संग्रह’ आहे. पुस्तकातील २७ निवडक कथा या बहुतांश नवोदित लेखक आणि वाचकांनी स्वतःच्या अनुभवांवर आधारित लिहिलेल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यातील संघर्ष, प्रेरणा, संवेदना आणि वास्तव यांचे प्रभावी चित्रण या कथांमधून अनुभवायला मिळते.
संस्कृती प्रकाशन आयोजित या प्रकाशन सोहळ्याला साहित्य, शिक्षण आणि प्रकाशन क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक व भाषातज्ज्ञ केशव सखाराम देशमुख, संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशिका सुनीताराजे पवार, फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. वसंतराव वाघ, साहित्यिक दिनेश फडतरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘कथा मनातली’ हा संग्रह केवळ पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम नसून सामान्य माणसाच्या अनुभवांना साहित्यिक अभिव्यक्ती देणाऱ्या एका चळवळीचे प्रतीक ठरत आहे. व्यावसायिक लेखकांच्या पलीकडे जाऊन समाजातील विविध स्तरांतील वाचकांना आपले अनुभव, संघर्ष, यश-अपयश आणि भावविश्व शब्दबद्ध करण्याची संधी या उपक्रमाने उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे हा संग्रह केवळ कथांचा संच न राहता नवोदित लेखकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
यावेळी ज्येष्ठ समीक्षक केशव देशमुख यांनी पुस्तकातील विविध कथांचा उल्लेख करत संग्रहाच्या साहित्यिक गुणवत्तेवर भाष्य केले. या कथा समाजातील सकारात्मक प्रेरणा आणि मानवी मूल्यांचे दर्शन घडवणाऱ्या असल्याचे त्यांनी नमूद केले. “वाचकांनी लेखकाच्या भूमिकेत जाऊन लिहिलेल्या या सर्व कथा साध्या माणसांच्या पण वाचकांच्या मनात घर करणार्या उत्तम संस्कार कथा आहेत. सोप्या भाषेत प्रभावी आणि आशयघन लेखन उभे करणे हे अत्यंत कठीण काम असते. मात्र अविनाश फडतरे यांनी हे आव्हान समर्थपणे पेलत वाचकांच्या अनुभवांना साहित्यिक स्वरूप दिले आहे.” असेही ते म्हणाले

प्रकाशक सुनिताराजे पवार म्हणाल्या, “वालीस कथा ही संकल्पना मराठी साहित्यविश्वासाठी नवी असली तरी वाचकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या प्रयोगाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भविष्यात अशा स्वरूपाचे आणखी साहित्यिक उपक्रम राबविले जातील. मराठी साहित्यातील अशा प्रयोगांची आवश्यकता व्यक्त केली. समाजातील असंख्य प्रेरणादायी, संघर्षमय आणि वास्तववादी अनुभव पुस्तकांच्या माध्यमातून पुढे येणे ही काळाची गरज आहे.
संपादक अविनाश फडतरे यांनीही मनोगत व्यक्त केले. पुस्तक निर्मितीमागील संकल्पना, वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि भविष्यात अशा साहित्यिक उपक्रमांना चालना देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
दिनेश फडतरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले शाम पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.





Users Today : 22
Users Yesterday : 130