शिरूर प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी निवडणुकीत मोठा तांत्रिक घोळ समोर आल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे तब्बल ७८ ग्रामपंचायतींचे ७२९ सदस्य मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून निवडणूक प्रक्रियेत झालेल्या त्रुटींवर आक्षेप घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीमध्ये अनेक पात्र ग्रामपंचायती सदस्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे केवळ १८ ग्रामपंचायतींचे सदस्य मतदानासाठी पात्र ठरले असून उर्वरित ७८ ग्रामपंचायतींचे ७२९ सदस्य मतदानापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या घडामोडींमुळे संपूर्ण निवडणूकच न्यायालयीन प्रक्रियेच्या भोवऱ्यात सापडली असून तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामपंचायत सदस्यांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले की प्रशासनाने मतदार यादी तयार करताना गंभीर निष्काळजीपणा केला आहे. सर्व पात्र सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणे आवश्यक असून मतदार यादीतील त्रुटी दूर केल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच निवडणुकीबाबत संपूर्ण स्पष्टता झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबविण्यात यावी, अन्यथा अनेक ग्रामपंचायतींवर अन्याय होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणाकडे शिरूर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून निवडणुकीचे भवितव्य निश्चित होणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.





Users Today : 101
Users Yesterday : 41