कोरेगाव भीमा – प्रतिनिधी (विनायक साबळे)
कोरेगाव भीमा आणि पेरणे या गावांदरम्यान भीमा नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पेरणे बाजूला मोठे भगदाड पडल्याने नदीकाठावरील शेतजमिनी तसेच अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बंधाऱ्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यानेच हे नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नदीमध्ये साचलेली जलपर्णी, झाडांच्या फांद्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या वेळेवर न काढल्यामुळे बंधाऱ्यावर अतिरिक्त ताण आला. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पाणी बंधाऱ्याच्या मुख्य मार्गाने न जाता बाजूने गेल्याने पेरणे बाजूच्या कडेला भगदाड पडले. परिणामी, पेरणे, डोंगरगाव, डिंग्रजवाडी, कोरेगाव भीमा आणि पिंपरी सांडस या गावांतील विद्युत पंप आणि शेती साधने नदीत वाहून गेली आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदतीची मागणी
“पाटबंधारे खात्याच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा त्वरित पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी,”
अशी मागणी पेरणे गावचे माजी सरपंच निलेश वाळके यांनी केली आहे.
वेळेवर दुरुस्ती केली असती तर…
“कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीने 27 मे 2025 रोजी पाटबंधारे विभागाला लेखी पत्र पाठवले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जर वेळेत दुरुस्ती केली असती तर आज ही वेळ आली नसती,”
असा आरोप सरपंच संदीप ढेरंगे यांनी केला आहे. त्यांनी प्रशासनाकडे तातडीने नवीन बंधाऱ्याची मागणी करत भविष्यातील धोके टाळण्याचे आवाहन केले.
विभागाची प्रतिक्रिया:
“कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची की वॉल पावसाच्या दाबामुळे वाहून गेली आहे. सदर दुरुस्ती युद्धपातळीवर हाती घेतली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे,”
असे शाखा अधिकारी राजाराम आहेर (कोंढापुरी पाटबंधारे शाखा) यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे नदीकाठावरील शेतकरी भयभीत असून, येत्या दिवसांत पावसाचा जोर वाढल्यास आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
