कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे)
उरुळी कांचन परिसरात शुक्रवारी मध्यरात्री मोठी खळबळ उडवणारी घटना घडली. गोरक्षकांनी गोमांस असल्याच्या संशयावरून मांस भरलेले तब्बल पाच मोठे ४० टी एसी कंटेनर उरुळी कांचन पोलीसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई शुक्रवारी (ता. २०) रात्री १ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
गोरक्षक अक्षय कांचन यांनी या कंटेनरमध्ये गोमांस असल्याचा संशय व्यक्त करत, संबंधित मांसाची तपासणी करून जर ते गोमांस असल्याचे निष्पन्न झाले तर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कंटेनरमध्ये किती मांस?
कंटेनर चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक कंटेनरमध्ये २७ ते २९ टन मांस भरलेले असून, एकूण पाच कंटेनरमध्ये सुमारे १३५ टन मांस असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रत्येक बॉक्स सुमारे २० किलो वजनाचा असून, एका कंटेनरमध्ये १४०० ते १४५० बॉक्स असल्याचेही सांगण्यात आले.
कुठून कुठे?
हे कंटेनर तेलंगणा राज्यातील जहीराबाद आणि संगारेड्डी येथून भरले गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व मांस निर्यात (एक्सपोर्ट) करण्यासाठी नवाशिवा (मुंबई) येथील जैन पेटी या ठिकाणी पाठवले जात होते.
कंटेनर क्रमांक एमएच-०६ बीडी-०४०२ चे चालकाने व इतर चालकांनीही ही माहिती दिली. एका कंटेनरचा चालक रंजीत सिंग (कंटेनर क्रमांक युपी ८१ एफटी ८००९) असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पुढील कार्यवाहीची मागणी
संपूर्ण प्रकरणाचा तपास उरुळी कांचन पोलिसांनी सुरू केला आहे. मांसाच्या नमुन्यांची अधिकृत तपासणी करून त्यामध्ये गोमांस असल्याचे सिद्ध झाल्यास, कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. दरम्यान, गोरक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत पुनःपुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.
