बालमनाचा तळ गाठणारा काव्यसंग्रह : वाघोबाचा मोबाईल

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :
करी मनोरंजन जो मुलांचे,
जडेल नाते प्रभुशी तयांचे, या उक्तीप्रमाणे मुलांच्या भाविश्वास समरस होणारे ,मुलांच्या अथांग मनाचा तळ शोधणारे, पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक बालकवी *सचिन बेंडभर* होय.
मराठी साहित्यात त्यांचे विपुल लेखन असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत .
यात बालसाहित्य, कथासंग्रह ,कवितासंग्रह ,कादंबरी आणि अनुवाद असे त्यांचे विविधांगी व चौरस लेखन आहे .
जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय वाबळेवाडी शाळेत ज्ञानदानाचे तळमळीने पवित्र सेवा बजवणारे सचिन सर. शिक्षकी पेशात असल्याने त्यांची मुलांशी चांगली नाळ जोडली . मुलांची आवड व त्यांचे भावविश्व अचूकपणे हेरले असल्याने त्यांच्या कविता अगदी सहजतेने उमलताना दिसतात.
खास बालदोस्तांसाठी वाघोबाचा मोबाईल हा बालकाव्य संग्रह त्यांच्या लेखणीतून अवतरलेला आहे . या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता मुलांचे मनोरंजन तर करतातच शिवाय त्यांच्यावर भावनिक व मानसिक आणि बौद्धिक संस्कारही करतात.
या कविता वाचताना निरागस बालमनाबरोबर वयोवृद्धांनाही बालवयात घेऊन जाण्यास भाग पाडतात.
संतोष घोंगडे यांचे ही मनापासून कौतुक करावे तेवढे कमी वाटते. कारण, प्रत्येक कवितेला साजेशी व बालमनाला आकर्षित करणारी चित्रमांडणी व मुखपृष्ठ त्यांनी केलेली आहे.
या काव्यसंग्रहात एकूण सोळा काव्याची गुंफण नकळत वाचकास भुरळ पाडते. कवितेला दिलेले शीर्षक बालमनाला आनंद देण्याबरोबरच त्यांच्या आवडीच्या भावविश्वाशी संलग्न असणारे प्राणी ,पक्षी ,वस्तू ,निसर्ग, नाते संबंधाशी जवळीकता साधणारे आहे .
या काव्यसंग्रहातील पहिलीच कविता ती म्हणजे वाघोबाचा मोबाईल,अप्रतिम रचना आहे.

वाढदिवसानीमित्त कोणाकोणाला बोलवायचे होते, पण मोबाईलच्या समस्येमुळे कुणालाच बोलवू शकला नाही ही खंत व्यक्त केली.
वाघ म्हणाला बछड्याचा
वाढदिवस साजरा करू
सगळे प्राणी बोलावू घरी
मोबाईलवर कॉल करू.
या कवितेतून आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून प्राणी जगताबरोबर वास्तवाशी जोडण्याचा रोमांचकारी अनुभव सुंदर रेखाटला आहे .

दिवसा मात्र उजेड पाहून ,सूर्य रोज येतो रात्रीचा अंधार पाहून, खरच का गं भितो
आपण खूप धीट म्हणून ,मारतो का गं बढाई
ठाऊक असेल तुला जर, सांगशील का गं आई .

सांगशील का ग आई, या कवितेतून आईला केलेला प्रश्न वाचकांनाही नक्कीच पडतो .

तुम्हीच आता सांगायचं राव
फुकट नाही आमची कावकाव
हुशार कावळा जगात नाव
लिंम्का बुकात नोंदवा ठराव .
हुशार कावळा ,कवितातून कावळा जरी काळा असला तरी त्याचा उपयोग किती! हे बालमनाला पटवून दिलेले आहे .
उठा उठा म्हणतो मला
पहाट आता उजाडली
घड्याळ न पाहताच
वेळ त्याला समजली.
सकाळचं कोंबड्याचं न चुकता आरावणं, तेही अचुक घडयाळ समजत असल्यासारखं …. आमचा कोंबडा या कवितेतून वेळचे महत्व विशद केले आहे .
बगळा बोले ऐका गडे
पोषण आहार माझ्याकडे
लिहिता येतात सगळे आकडे
पाठ आहेत माझे पाढे .
शांत व्हा पोपट बोले
सर्व जणांचे सारे चुकले
शाळाबाह्य आकडे खोटे
वटवाघूळ गेली कोठे ?
भरणार कशी कोठे शाळा
संपूर्ण जाऊ द्या पावसाळा
वर्ग बांधू आगळा वेगळा
मगच सुरू करू शाळा.
वास्तविकतेचा उच्चांक गाठणारी ही पाखरशाळा कविता होय. कावळा, कोकिळ, घार,बगळा या पक्ष्यांची प्रतिके वापरुन शाळेच्या विविध उपक्रमांच्या भडिमारातून शिक्षकांची होणारी ससेहोलपट.पाखरशाळेतून व्यक्त केली आहे.

या विविध कवितेतून मुलांची वाचनसंस्कृती वाढावी., हाच मूळ उद्देश होय. लहान मुले अगदी नकळतपणे कवितेशी समरस नक्कीच होतील ,इतक्या सहजतेने व ओघवत्या शैलीत रचना मांडली आहे.
लेखनातील सहजता हे त्यांच्या कवितेचे खास वैशिष्ट्य आहे .त्यांच्या पुस्तकातील अनेक कविता किशोर मासिकातही प्रकाशित झालेल्या आहेत .
वाघोबाचा मोबाईल , हा काव्यसंग्रह अतिशय वाचणीय आहे. नक्की वाचाल अशी खात्री आहे …काय मग वाचाल ना!.
बालमनाला जपणारे सचिन बेंडभर यांना पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 1 4 3
Users Today : 81
Users Yesterday : 503