शिक्रापूर प्रतिनिधी:भरत चव्हाण
लातूर तालुक्यातील काटगाव या अत्यंत मागासलेल्या खेडेगावात 1940 साली जन्मलेले आणि ग्रामीण कथा, कादंबरी आणि नाटककार म्हणून ओळखले जाणारे रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा. रं. बोराडे यांनी संभाजीनगर येथे मंगळवारी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच ग्रामीण साहित्यातला आधारवड हरपला या शब्दात पुणे जिल्ह्यातील साहित्यिक सचिन बेंडभर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते पुढे म्हणाले,
पाचोळा ही त्यांची कादंबरी साहित्य वर्तुळात प्रसिद्ध आहे. या कादंबरीचे असंख्य वाचक असून या कादंबरीने बोराडे सरांना नवी ओळख निर्माण करून दिली होती. एक अत्यंत संवेदनशील भावनिक मातीशी नाते जोडणारे प्राचार्य बोराडे हे विद्यार्थ्यांचेही प्रिय होते. सरांच्या जाण्याने ग्रामीण दलित आणि शहरी भागाची साहित्य चळवळीची नाळ तुटली आहे. मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न लेखक व ग्रामीण साहित्याचे चालते बोलते विद्यापीठ आणि ग्रामीण साहित्याचा केंद्रबिंदू असलेल्या बोराडे सरांच्या अचानक जाण्याने साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर लातूर जिल्ह्याचे सुपुत्र जरी असली तरी मराठवाड्याच्याही सीमा ओलांडून त्यांनी ग्रामीण साहित्यात आपले अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांचे अचानक जाणे म्हणजे कधीही न भरून येणारी मोठी हानी साहित्य विश्वात झाली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
