शिरुर प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे आणि शिवांजली साहित्यपीठ, शिवांजली ग्रामीण विकास प्रतिष्ठान, चाळकवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन घेण्यात आले. यावेळी येथील मुलांशी साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त कवी एकनाथ आव्हाड यांनी संवाद साधला. त्यास मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांच्या कथा आणि कवितांना टाळ्यांनी दाद दिली.
यावेळी आव्हाड यांनी मुलांना कवितेची सुरुवात कशी झाली ते सांगताना आपली पहिली कविता ‘सविता पटेकर-सतत गैरहजर’ यासह वार्षिक शाळा तपासणीवरील कविता, ठमाकाकुंची कविता, आयं म्या रोज साळंत जाईन तसेच माझी वही या व अशा अनेक मुलांच्या भावविश्वाशी निगडीत असणाऱ्या कविता सादर केल्या. तर कावळ्याने खाल्ल्या शेवया ही मनोरंजक कथा अशी सादर केली की अगदी लहानांनीच नव्हे तर मोठ्यांनीही स्तब्ध होऊन संमेलनस्थळी ती कथा ऐकली. कथेत सहभाग घेतला. यावेळी आव्हाड यांची जादू पूर्ण संमेलनात पसरली.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष सूर्यकांत सराफ, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, शिवांजली साहित्यपीठ जुन्नरचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव चाळक, जालिंदर डोंगरे, डॉ. कैलास दौंड, भास्कर बडे, डॉ. विनोद सिनकर, रमेश तांबे, संजय ऐलवाड, सचिन बेंडभर, बाळकृष्ण बाचल, उत्तम सदाकाळ, श्रीकांत चौगुले, अशोक सातपुते, राजेंद्र कुलकर्णी, अण्णासाहेब महाले, अलका बडे, सुभाष कोरडे, प्रशांत शेटे आणि चाळकवाडी संस्थेचे अध्यक्ष संदीप वाघोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
[‘मनोरंजनातून बालसाहित्य’ विषयावरील परिसंवादात मुलांशी संवाद साधताना एकनाथ आव्हाड.]
