पुणे प्रतिनिधी: सागर पवार
कार्तिक शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्त्व असते.या दिवसाचे औचित्य साधत ,गाणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी, श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला ११०० शे नारळ समर्पित करण्यात आले
अंतःकरणातील अहंकार आणि ममत्वाचे मळभ दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच् प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडते, त्यांना म्हणतात उमांगमलज.
त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत श्रीं ना ११०० नारळांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नारळांची आरास व धार्मिक विधी यानिमित्ताने मंदिरामध्ये पार पडले. पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त, पहाटे ४ ते सकाळी ६ दरम्यान गायिका रसिक कुलकर्णी आणि सानिका कुलकर्णी यांचा स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रम झाला .त्यांना तबला साथ अक्षय भडंगे यांनी तर ऑक्टपॅड वादन साथ यश जवळकर यांनी केली आणि सकाळी ८ वाजता गणेश याग देखील पार पडला.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनिलभाऊ रासने म्हणाले, देवी पार्वतीने अंगावरच्या मळापासून एक पुतळा बनवला. त्याला जिवंत केले. पुढे त्याचे आणि शंकरांचे युद्ध झाले. भगवान शंकरांनी त्या मुलाचे मस्तक उडविले. देवी पार्वतीच्या संतापाला शांत करण्यासाठी शेवटी त्या बालकाच्या धडावर भगवान श्री विष्णूंनी आणलेले गज मस्तक बसविण्यात आले. त्यांना श्री गजानन असे म्हटले आहे. ही श्री गणेश जन्माची कथा आपण नेहमी ऐकतो ती या अवताराची कथा आहे. या अवतारात भगवान श्री गणेशांचे नाव आहे उमांगमलज.
ते पुढे म्हणाले, उमा म्हणजे देवी पार्वती. तिच्या अंगावरील मळापासून ज म्हणजे जन्माला आलेला. असा याचा शब्दशः अर्थ. हा जशाला तसा लागू पडतच नाही. देवी पार्वतीच्या अंगावर पुतळा म्हणण्याइतका मळ असेल तरी कसा? तर लक्षात घ्यायला हवे की या सर्व कथा अध्यात्माचे निरूपण करण्यासाठीच असतात.
आपली बुद्धी हीच पार्वती देवी आहे. तिच्यावर चढलेला अहंकार आणि ममत्वाचा थर हाच मळ आहे. हा अहंकार आणि ममत्व दूर झाले की ज्या मोरयांची प्राप्ती होते त्यांना उमांगमलज असे म्हणतात.






Users Today : 4
Users Yesterday : 9