शिरूर, प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर
अखिल भारतीय किसान सभेच्या पुणे जिल्हा समितीचे त्रैवार्षिक दहावे अधिवेशन शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे उत्साहात व यशस्वी वातावरणात पार पडले. शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण प्रश्नांवर सखोल चर्चा करत विविध महत्त्वपूर्ण ठराव या अधिवेशनात एकमताने मंजूर करण्यात आले.

भारतातील शेतकरी चळवळीला ऐतिहासिक परंपरा लाभलेली असून सन १९३६ मध्ये स्थापन झालेल्या किसान सभेने शेतकरी हितासाठी राज्यभर सातत्याने संघर्ष उभारला आहे. सध्या राज्यभर किसान सभेची त्रैवार्षिक अधिवेशने सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्हा अधिवेशन मांडवगण फराटा येथे आयोजित करण्यात आले होते.
अधिवेशनात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालाला रास्त भाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, दुधाला हमीभाव, हिरड्याला हमीभाव तसेच निराधारांच्या पेन्शनमध्ये वाढ यांसारखे महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. पुढील काळातील किसान सभेच्या आंदोलनाची दिशा देखील या अधिवेशनात निश्चित करण्यात आली.
या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉ. उमेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाचे दर आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर भाष्य करत आगामी काळात शेतकरी एकजूट अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.

उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर, माकपा पुणे जिल्हा सचिव कॉ. गणेश दराडे, वडगाव रासाई ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन शेलार, सिटू कामगार संघटनेचे नेते कॉ. वसंत पवार, एस.एफ.आय. संघटनेचे नेते नवनाथ मोरे तसेच लोकशाहीवादी युवक संघटनेचे नेते डॉ. ज्ञानेश्वर मोटे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अधिवेशनाला शुभेच्छा देत शेतकरी चळवळीला भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अधिवेशनात मागील तीन वर्षांचा कार्य अहवाल व आर्थिक अहवाल सादर करण्यात आला. यावर सविस्तर चर्चा होऊन दोन्ही अहवाल एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर पुढील कामकाजाच्या दृष्टीने विविध संघटनात्मक ठराव मंजूर करण्यात आले.
समारोप प्रसंगी किसान सभेचे राज्य सहसचिव डॉ. अजित नवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “शेती व शेतकरी गंभीर संकटात असताना सत्ताधारी शेतकरीविरोधी धोरणे राबवत आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी व शेतमजुरांनी एकत्र येत प्रभावी संघर्ष उभारणे ही काळाची गरज आहे.” यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविंद्र धनक यांनीही उपस्थित राहून अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या.

या अधिवेशनात पुढील तीन वर्षांसाठी किसान सभेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ शेतकरी नेते कॉ. महेंद्र थोरात यांची, तर जिल्हा सचिवपदी कॉ. अशोक पेकारी यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी अॅड. नाथा शिंगाडे, राजू घोडे व लक्ष्मण जोशी, सहसचिवपदी संतोष कांबळे व आमोद गरुड, तर खजिनदारपदी कमल बांबळे यांची निवड करण्यात आली. जिल्हा समिती सदस्य म्हणून दत्तोबा बर्डे, सोमनाथ धारवाड व मुकुंद घोडे यांचीही एकमताने निवड करण्यात आली.





Users Today : 27
Users Yesterday : 34