कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे)
बकोरी येथील वनराईचे वृक्षप्रेमी व माहिती सेवा समितीचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गोविंद वारघडे यांना सायबर गुन्हेगारांनी एक लाख ५२ हजार रुपयांना गंडा घातला असून ,त्यांच्या वाघोली येथील पंजाब नॅशनल बँकेच्या बचत खात्यामधून सायबर गुन्हेगारांनी फक्त दोन तासांमध्ये एक लाख ५२ हजार रुपये गायब केले आहेत,
वारघडे यांनी अडचणी पोटी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून बुधवार(दि.२७) रोजी सोने तारण करून कर्ज प्रकरण केले होते, त्यानंतर त्यांनी (दि. ७) डिसेंबर रोजी आरटीजीएस द्वारे त्यांच्या पंजाब नॅशनल बँकेमध्ये ते पैसे ट्रान्सफर केले होते ,सायबर गुन्हेगारांना याची खबर लागताच त्यांनी (दि.१०) डिसेंबर चंद्रकांत वारघडे यांना पंजाब नॅशनल बँके मधून बोलतोय असे खोटे सांगून बोलण्यात गुंतविले आणि तेथून पुढे फक्त दोन तासांमध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळे अकाउंट वर ठराविक वेळेने प्रत्येकी पाच,दहा आणि तीन हजार रुपये प्रमाणे ट्रान्सफर करून एक लाख ५२हजार रुपये गायब केले आहेत,
परिसरामध्ये अनेकांच्या अडीअडचणीमध्ये चंद्रकांत वारघडे हे नेहमी सामाजिक हितासाठी धावून जातात त्यांचीच सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाल्यामुळे अनेक व्यावसायिक, खातेदार यांचे धाबे दणाणले असून दैनंदिन बँकेमध्ये व्यवहार करणाऱ्यांमध्ये परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,
या संदर्भात चंद्रकांत वारघडे यांनी वाघोली पोलीस स्टेशन, सायबर क्राईम विभाग, पंजाब नॅशनल बँक वाघोली शाखा, रिझर्व बँक दिल्ली आणि पंजाब नॅशनल बँक दिल्ली येथील मुख्य शाखेमध्ये तक्रार केली असून ,पंजाब नॅशनल बँकेने या संदर्भात ही सर्व जबाबदारी ग्राहकांची असून त्या संदर्भात बँक कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार नाही असे प्रतिपादन वारघडे यांना केले आहे,
यासंदर्भात पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांनी सावधगिरीने आपले व्यवहार करण्याचे आवाहन वारघडे यांनी केले आहे, तरी अनोळखी येणाऱ्या मेसेज अथवा फोन कॉल पासून ग्राहकांनी सावधानता बाळगावी अनोळख्या व्यक्तीबरोबर जास्त संभाषण टाळावे असे आवाहन पंजाब नॅशनल बँकेचे वाघोली येथील व्यवस्थापक तुषार केदार यांनी केले आहे.
